मुख्यमंत्र्यांसोबत विशेष बैठक लवकरच होणार – पालकमंत्री आशिष शेलार यांचे ठोस आश्वासन
📅 29 एप्रिल 2025, मुंबई
मुंबईतील गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांच्या हक्काच्या घरांसाठी सुरू असलेल्या गिरणी कामगार एकजूट संघटनेच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. गिरणी कामगारांच्या न्याय्य मागण्यांकडे शासन गांभीर्याने पाहत असून, लवकरच मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिष्टमंडळाची विशेष बैठक निश्चित करण्यात येणार आहे.
ही सकारात्मक घडामोड मा. पालकमंत्री आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री मा. आशिष शेलार यांच्या पुढाकारामुळे शक्य झाली. 26 एप्रिल 2025 रोजी एकजूट संघटनेच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली असता, त्यांनी गिरणी कामगारांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली आणि हा गंभीर व संवेदनशील विषय सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बैठक निश्चित करण्याचे ठोस आश्वासन दिले.
आज 29 एप्रिल 2025 रोजी मा. आशिष शेलार यांनी स्वतः मा. मुख्यमंत्री यांना बैठकीचे अधिकृत निवेदन सादर केले.
“जन्मभूमी आणि कर्मभूमी मुंबई असताना आमचे पुनर्वसन वांगणी, शेलू येथे का?” “गिरणी कामगारांशी कोणताही संबंध नसलेले काही लोक आमच्या घरांची किंमत व धोरणे का ठरवत आहेत?” “SRA प्रकल्प, झोपडपट्टी पुनर्वसन मुंबईतच शक्य असताना, आमच्यासाठी का नाही?”
एजंटशाहीच्या विरोधात प्रबळ आवाज
यावेळी आंदोलनात उपस्थित गिरणी कामगार व वारसांनी स्पष्टपणे सांगितले की एजंट संघटनांनी आंदोलनाचे व पुनर्वसनाचे मोठे नुकसान केले आहे. आजचा दिवस हा हक्काच्या लढ्याला योग्य दिशा देणारा ठरला आहे.
27 एप्रिलला शेलार कार्यालयावर कामगारांचा जोरदार मोर्चा
रविवार, 27 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता बांद्रा पश्चिम येथील पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर एकजूट संघटनेच्या नेतृत्वात कामगार व वारसांनी उपस्थित राहून आपला आवाज बुलंद केला.
आता एकच निर्धार – “मुंबईतच घर, अन्यायाला पूर्ण विराम”
हे यश केवळ एक आंदोलनाचे फलित नाही, तर सामूहिक एकतेच्या बळावर मिळालेला विजय आहे. पुढील टप्प्यात शासनाशी होणाऱ्या बैठकीसाठी कामगार व वारसांनी योग्य भूमिका घेत एकसंघपणे पुढे जाणे अत्यावश्यक आहे.
गिरणी कामगार एकजूट संघटना