Home » LATEST NEWS » गिरणी कामगारांचा न्यायाचा लढा आता कायदेशीर आणि धोरणात्मक पातळीवर अधिक तीव्र होणार!

गिरणी कामगारांचा न्यायाचा लढा आता कायदेशीर आणि धोरणात्मक पातळीवर अधिक तीव्र होणार!

पुणे : ०९ मे २०२५- संयुक्त मराठी मुंबई चळवळीने दिनांक ०९ मे २०२५ रोजी पुणे येथे कायदेतज्ज्ञ मा. अ‍ॅड. असीम सरोदे यांची विशेष भेट घेतली. या बैठकीत गिरणी कामगारांच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांवर सविस्तर आणि प्रदीर्घ चर्चा झाली.

बैठकीत मुख्यत्वे दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर देण्यात आला — पहिला, पात्र कामगार व त्यांच्या वारसांना मुंबईतच घर मिळावे; आणि दुसरा, आजवर अर्ज न करू शकलेले सर्व, अपात्र ठरलेले, तसेच १९८१ सालच्या संपातील कामगार यांनाही या प्रक्रियेत नव्याने सामावून घेण्याची गरज आहे. या दोन्ही प्रश्नांवर कायदेतज्ज्ञ मा. अ‍ॅड. असीम सरोदे यांनी सखोल मार्गदर्शन दिले आणि लवकरच या प्रश्नांवर अ‍ॅड. असीम सरोदे यांच्या सल्ल्याने न्यायालयीन लढा उभारण्याची तयारी असल्याची माहिती संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे अध्यक्ष विवेकानंद बेलुसे यांनी दिली.

त्याचबरोबर, कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे यांच्या अभ्यासपूर्ण सल्ल्यानुसार गिरणी कामगारांसाठी स्वतंत्र आणि विशेष धोरण तयार करण्याची मागणी संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडे लवकरच करण्यात येणार असल्याचेही ठळकपणे सांगण्यात आले. या चर्चेच्या आणि सल्ल्याच्या बळावर, येणाऱ्या अधिवेशन काळात गिरणी कामगारांसाठी स्वतंत्र कायदा व विशेष धोरणासाठी निर्णायक लढा उभारण्यात येईल, असे ठाम मत चळवळीच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले आहे.

गिरणी कामगारांचा न्यायाचा लढा आता कायदेशीर आणि धोरणात्मक पातळीवर अधिक तीव्र होणार, हे या बैठकीतून स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *