मुंबईच्या रस्त्यांवरून चालताना कुठल्याही वयोवृद्ध माणसाच्या डोळ्यांत डोकावून पाहिलं, तर त्यात एक वेदना दिसेल. ही वेदना आहे गिरणी कामगारांची! त्यांच्या संघर्षाची, त्यांच्या प्रतीक्षेची, त्यांच्या तुटलेल्या स्वप्नांची!
१९८२ सालचा तो ऐतिहासिक संप, ज्या संपानं लाखो गिरणी कामगार रस्त्यावर आणले, आजही त्या संपाचे पडसाद त्यांच्या आयुष्यभराच्या दु:खात उमटत आहेत. गिरण्या बंद पडल्या, रोजगार गेला, सरकारं बदलली, पण त्यांचे आयुष्य मात्र तसेच राहिले—अधुरे, अपूर्ण आणि अव्यक्त!
घराचं स्वप्न आणि उध्वस्त आयुष्य
मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये, मोडकळीस आलेल्या खोलीत एक वयोवृद्ध गिरणी कामगार आजही आपल्या नशिबाचा खेळ पाहतोय. त्याच्या हातात सरकारने दिलेले जुने कागदपत्र आहेत, ज्यात लिहिलंय—’तुम्हाला घर मिळेल… लवकरच!’ पण हे ‘लवकरच’ त्याच्या तरुणपणीचं होतं. आता त्याच्या डोळ्यांत थकल्याची झाक आहे, शरीर थकून गेलंय, पण त्याच्या आशेचा धागा मात्र सुटला नाही.हजारो गिरणी कामगार वयाच्या ऐंशीव्या वर्षीही घराच्या प्रतीक्षेत सरकारच्या दारात उभे आहेत. हीच का मुंबई? हा न्याय आहे का?
कष्टाच्या बदल्यात संघर्षच मिळाला!
एका काळी मुंबईच्या गिरण्यांमध्ये घाम गाळणाऱ्या हातांनी या शहराला उद्योगाची ओळख दिली. त्याच हातांनी हजारो गज सूत फिरवलं, कापड विणलं, लाखो टन वस्त्रनिर्मिती केली. पण आज त्याच हातांमध्ये आहे फक्त अपेक्षेचा मोडलेला आधार.
एक बाप आपल्या मुलाला सांगतो—”बाळा, तुझ्या आजोबांनी ही गिरणी चालवली, तुझ्या बाबांनी संप केला, आणि आता मी तुझ्यासाठी हक्काचं घर मागतोय…”पण त्या मुलाच्या डोळ्यांत फक्त निराशा दिसते. तो थंड आवाजात उत्तर देतो—”बाबा, आता सोडा… हे घर कधीच मिळणार नाही!”
किती सरकारं आली, गेली… पण न्याय कुठे आहे?
गिरणीच्या जमिनींवर गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या. ती जमीन कोट्यवधींना विकली गेली. मोठमोठ्या टॉवरमध्ये फ्लॅट्स विकले गेले. पण त्या जमिनीवर घाम गाळणाऱ्या माणसाला एक खोलीही मिळाली नाही.“माझ्या नवऱ्याचं नाव आहे का यादीत?” एक विधवा आजी सरकारी कार्यालयात विचारते. तिच्यासमोर एक जुना अधिकाऱ्याने एक कागद फिरवतो आणि उत्तर देतो — “तुमच्या नवऱ्याचं नाव आहे… पण तुम्हाला घर कधी मिळेल, ते सांगता येत नाही!”
अजून किती जण मरतील प्रतीक्षेत?
कोणाला आशा आहे की त्यांच्या मुलांना तरी हे घर मिळेल, पण ती आशाही आता मावळू लागलीय. ज्या सरकारांनी यांना विश्वास दिला, त्यांनीच आता डोळे फिरवले. ”कधी मिळेल घर?””लवकरच…”पण हे ‘लवकरच’ अजून किती गिरणी कामगारांच्या अंत्यसंस्कारानंतर येणार? आणखी किती मरावे लागतील या एका घरासाठी?
हा संघर्ष आता थांबायला हवा!
गिरणी कामगारांनी आयुष्यभर इथल्या भांडवलदारांसाठी काम केलं, त्यांच्या संपत्तीसाठी झगडले. पण आज त्यांना त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढावं लागतंय? ही विडंबना संपायला हवी. मुंबईच्या गगनचुंबी इमारतींच्या सावलीत अजूनही एक वृद्ध गिरणी कामगार आपल्या पत्रांसोबत रस्त्यावर बसून आहे. तो कोणाची वाट पाहतोय? कदाचित न्यायाची… किंवा कदाचित मृत्यूची!पण हा मृत्यू या लढ्याचा अंत ठरू नये.
✍🏻 रमाकांत बने