Home » महाराष्ट्र » तुझ्या हाती आहे—मराठी संस्कृतीचा विजय, की पराभव? तू काय निवडशील?

तुझ्या हाती आहे—मराठी संस्कृतीचा विजय, की पराभव? तू काय निवडशील?

मराठी माणसा, तुझे अस्तित्वच मिटवायचा डाव आहे – तू जागा होणार आहेस का?

लेखन-रमाकांत बने-९१७५३७८१९९ 

कधी काळी गर्जना करणाऱ्या सिंहाची अवस्था आज सैरभैर हरणासारखी झाली आहे. ज्या मातीत छत्रपती शिवराय जन्मले, जिथे टिळकांनी “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” म्हणून गर्जना केली, जिथे सावरकरांनी देशासाठी सर्वस्व झोकून दिलं—तीच माती, तीच संस्कृती, तेच मराठीपण आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

मराठी माणसा, हे तुला जाणवतंय का? की तुझ्या डोळ्यासमोर तुझी संस्कृती नष्ट होत असताना तू फक्त प्रेक्षक बनून उभा आहेस?

मराठी माणूस हरवत चाललाय, आणि त्याला स्वतःलाही त्याची फिकीर नाही!

कोणीतरी तुला धीम्या गतीने संपवत आहे. तुझ्या हातातून तुझं शहर निसटत आहे, तुझ्या घराच्या भिंतींमध्ये दुसऱ्यांची भाषा घुमते आहे, आणि तुला त्याची जाणीवही नाही! मुंबई तुझी होती, पण आता तुझ्या हक्काच्या जमिनीवरच तुला निर्वासित व्हावं लागत आहे. पुण्यातूनही मराठीचा ओघ आटत चाललाय. ठाणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर—ही आपलीच नगरी होती. पण आता इथं तुझं अस्तित्व दुर्बल होत चाललंय.

आज तुझ्या भाषेचा आवाज दाबला जात आहे. तूच तुझ्या मुलांना इंग्रजी शाळेत घालतोयस आणि मराठीत बोलण्याची लाज वाटून घेतोयस. मराठीत बोलणाऱ्याला ‘गावरान’ म्हणतोस, आणि स्वतःच्या ओळखीवरच हसू लागतोस. काय मिळालं तुला यामधून? मोठ्या पदावर असलास तरी आपल्या मातृभाषेला विसरून तू खरंच मोठा झालास का?

आजच्या पिढीला विचारून पाहा, छत्रपती शिवराय कोण होते? बाजीप्रभू देशपांडे कोण होते? लोकमान्य टिळक काय सांगायचे? आणि मग एक क्षण स्वतःशीच विचार कर—हा इतिहास विसरणारी पिढी उद्या कोणाच्या मुळांशी नाळ जोडणार?

तू नसेल, तर मराठीही नसेल!

कधी स्वप्नात विचार केलास का—उद्याचा महाराष्ट्र कसा असेल? जर मराठी माणूस असाच ढिसाळ राहिला, जर तुझी उदासीनता असंच वाढत राहिली, तर उद्या महाराष्ट्रात मराठीत बोलणारा माणूस शोधूनही सापडणार नाही. एकेकाळी बलाढ्य मराठ्यांची भूमी असलेला महाराष्ट्रच मराठ्यांविना राहील!

हे ऐकून अंगावर काटा आला का? आला पाहिजे! कारण हीच सत्याची जळजळीत धार आहे.

मराठी अस्तित्व वाचवायचं असेल, तर तुझ्या रक्तातली मराठेशाही पुन्हा जागी कर!

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभं केलं, तेव्हा त्यांच्यासमोर पराक्रमी मुघल होते. पण तरीही त्यांनी आपली संस्कृती, आपला अभिमान सोडला नाही. तू कोणत्या भीतीनं झुकतो आहेस? तुझं अस्तित्वच जर वाचवायचं असेल, तर तूच तुझ्या मराठी अस्मितेसाठी उभा राहिला पाहिजेस.

मराठी माणसा, हा लढा अस्तित्वाचा आहे! ही मातीतली तुझी ओळख टिकवायची असेल, तर आताच जागा हो, नाहीतर उद्या तुला ओळखणारा कोणीच उरणार नाही.

तुझ्या हाती आहे—मराठी संस्कृतीचा विजय, की पराभव? तू काय निवडशील?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *