✍ लेखन – रमाकांत बने
दर तीन-चार महिन्यांनी विधीमंडळाचे अधिवेशन येते आणि माझ्या गिरणी कामगाराच्या मनात पुन्हा एक आशेचा किरण जागतो. वाटते की यावेळी तरी आमच्या हक्कांचे, आमच्या संघर्षांचे, आमच्या जिवाभावाच्या प्रश्नांचे निराकरण होईल. पण दुर्दैवाने, हे अधिवेशन संपताच आशेचा हा किरण पुन्हा मावळतो. कारण आपल्या मतांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या पारंपरिक प्रथेप्रमाणे गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना नेहमीप्रमाणेच दुर्लक्षित केले (फाट्यावर मारले ). हे सत्य आहे आणि या कटू सत्याला कुठल्याही शब्दांचा मुलामा लावून लपवता येणार नाही.
गिरणी कामगारांच्या संघर्षाची व्यथा
१९८२ साली सुरू झालेल्या संपातून गिरणी कामगारांनी आपल्या हक्कांसाठी, आपल्या हक्काच्या घरांसाठी आणि आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी उभा राहण्याचा प्रयत्न केला. पण आज चार दशके उलटून गेली तरी हा संघर्ष संपलेला नाही. राजकीय नेत्यांनी फक्त आश्वासनांची टोपली पुढे केली, पण त्यातून कधीही समाधानाचं फुल उमललं नाही.
राजकारण्यांसाठी गिरणी कामगार हा फक्त निवडणुकीत मतांसाठी वापरायचा वर्ग बनून राहिला आहे. अधिवेशनात यावर चर्चा होते, घोषणा होतात, पण प्रत्यक्ष कृतीच्या पातळीवर मात्र हा विषय धुळखात पडतो. कित्येक विधेयकं, कित्येक योजना जाहीर झाल्या, पण अंमलबजावणी मात्र झालीच नाही. हे राजकारणी अधिवेशनात मोठमोठ्या गप्पा मारतात, मात्र प्रत्यक्ष मदतीच्या वेळी गप्प राहतात.
वारसांचा आक्रोश आणि प्रशासनाचा उदासीनपणा
गिरणी कामगारांचे वारस आजही त्यांच्यासाठी दिलेल्या घरांच्या प्रतीक्षेत आहेत. अनेकांनी आपल्या आयुष्यभराची कमाई आशेवर लावली. काहींनी सरकारच्या नावे अर्ज केले, तर काहींनी न्यायालयाच्या उंबरठ्यावर धाव घेतली. मात्र, ही यंत्रणा एवढी कुचकामी आणि भ्रष्ट झाली आहे की, सार्वजनिक घर वाटपाच्या प्रक्रिया तुंबल्या, कागदपत्रांची अडचण दाखवली जाते, आणि काही लोक तर वयाच्या संध्याकाळीही घराच्या प्रतीक्षेतच आहेत. हे लज्जास्पद नाही का?
आता हा अन्याय संपायलाच हवा!
गिरणी कामगार आणि त्यांचे वारस, आता तरी जागे व्हा! जर आपण संघटित होऊन लढा दिला नाही, तर हाच अन्याय पुढच्या पिढीपर्यंतही सुरू राहील. नेत्यांना आपली ताकद दाखवायची वेळ आली आहे. आता आपण जर अजूनही गप्प राहिलो, तर उद्या आपल्या मुलांनी आपल्यालाच दोष देऊन विचारले, “तुम्ही तेव्हा का नाही आवाज उठवला?”
एकत्र या, लढा द्या, आणि विजय मिळवा!
जर यश हवे असेल, तर आपले स्वार्थ बाजूला ठेवा, एकत्र या, आणि या राजकारण्यांची मस्ती उतरवा. आता वेळ आली आहे की आपण केवळ आश्वासनांवर न रहाता, आपल्या न्यायहक्कांसाठी ठोस पावलं उचलू. गिरणी कामगारांच्या न्यायासाठी एकजूट होऊया आणि आपल्या न्याय्य हक्कांसाठी निर्णायक लढा देऊया.
“हे आमच्या घामाचे हक्काचे घर आहे, कोणत्याही नेत्याची भीक नाही!”