महाराष्ट्रातील शिवकार्य करणाऱ्या संघटना संपल्या का? – संयुक्त मराठी मुंबई चळवळीचा सवाल
महाराष्ट्राची भूमी ही छत्रपती शिवरायांची आहे, इथला कणाकण शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देतो. या मातीतून ज्यांनी औरंगजेबाच्या जुलमी राजवटीचा अंत केला, त्याच महाराष्ट्रात आज औरंगजेबाच्या कबरीबद्दल वाद का निर्माण होत आहेत? आणि सर्वात मोठा प्रश्न – हा निर्णय महाराष्ट्राच्या मावळ्यांनी घ्यायचा की बाहेरच्यांनी?
मराठी माणूस कुठे कमी पडला?
आज जर बाहेरचे लोक येऊन सांगत असतील की “तुम्ही हे करा, ते करा”, तर मराठी माणसाने आत्मचिंतन करायला हवं. महाराष्ट्रातील मावळे कुठे कमी पडले की आपल्याला स्वतःच्या भूमीतील निर्णय दुसऱ्यांकडून ठरवून घ्यावे लागत आहेत?
आपली भूमी, आपला निर्णय – मग हस्तक्षेप का?
महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीबाबत चर्चा आणि राजकारण रंगतं आहे. परंतु, या भूमीतील मावळे इतके निस्तेज झाले आहेत का, की या कबरीबद्दल निर्णय घेण्यासाठी बाहेरच्यांची गरज पडावी? हा निर्णय महाराष्ट्राने घ्यायचा आहे, दिल्लीने नाही, उत्तर प्रदेशने नाही आणि कोणत्याही बाहेरच्या शक्तींनी नाही. मराठ्यांनी औरंगजेबाच्या जुलमी राजवटीला संपवलं, मग आज त्याच मराठी मातीला बाहेरच्यांनी निर्णय सांगायचा का?
महाराष्ट्राचा अभिमान ठेवा – बाहेरच्यांची गरज नाही!
महाराष्ट्र हे स्वाभिमानी लोकांचं राज्य आहे. जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा अमानुष छळ झाला, तेव्हा संपूर्ण मराठेशाही पेटली होती. त्याच महाराष्ट्रात आज असं काय झालं की आपल्याला बाहेरून कोणी येऊन शिकवावं लागतं? शिवरायांचा महाराष्ट्र आज एवढा दुर्बल झाला आहे का?
मराठी अस्मिता – संघर्ष करण्याची वेळ आली आहे!
आज आपण जर शांत बसलो, गप्प राहिलो, बाहेरच्यांचे हस्तक्षेप सहन केले, तर उद्या शिवरायांचाही अपमान करण्याची कोणीतरी हिम्मत करेल. हेच जर थांबवायचं असेल, तर मराठी माणसाने आता संघटित होऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे. आज जोपर्यंत आपण ठाम भूमिका घेत नाही, तोपर्यंत आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह येत राहील.
मावळ्यांनो, एकत्र या – हा लढा तुमचाच आहे!
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी कित्येक मावळ्यांनी बलिदान दिलं. आज जर महाराष्ट्रात राहूनही इथल्या निर्णयांवर बाहेरच्यांनी प्रभाव टाकायचा असेल, तर हे स्वाभिमानी महाराष्ट्राचं अपयश ठरेल. आपण आपले निर्णय स्वतः घ्यायचे की दुसऱ्यांच्या हातात द्यायचे, हे आज ठरवण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्र जर औरंग्याला मातीत गाडू शकतो, तर…
इतिहास साक्षी आहे की या मातीत जन्मलेल्या मराठ्यांनी औरंगजेबाला या मातीत गाडलं. मग आज जर त्याच्या कबरीबाबत निर्णय घ्यायचाच असेल, तर तो महाराष्ट्र आणि त्याचे मावळेच घेणार! महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवून त्याबद्दल इतरांनी भाष्य करणे सहन केले जाणार नाही.
मराठ्यांचा इतिहास बाहेरच्यांनी लिहायचा नाही!
आपल्या भूमीचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या इतिहासाचा आणि आपल्या अस्मितेचा निर्णय महाराष्ट्राच्या माणसांनी घ्यायचा, तो इतरांनी नाही! महाराष्ट्राच्या मातीला आणि इथल्या संताना आणि राजांना आदर न दाखवणाऱ्या कोणत्याही बाहेरच्या शक्तींना सांगायची हीच वेळ आहे –
“हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, इथला इतिहास आम्ही ठरवतो, बाहेरचे नाही!”
मराठी माणसाने आत्मचिंतन करण्याची गरज!
आज जर मराठी माणूस एकत्र आला नाही, तर उद्या आपल्याच इतिहासावर दुसरे ताबा मिळवतील.
आपल्या भूमीतील निर्णय बाहेरच्यांनी घ्यायचा नाही, हे ठणकावून सांगायची वेळ आली आहे.
शिवरायांच्या शिकवणीचा अपमान होऊ द्यायचा नाही, ही भूमिका आता स्पष्ट केली पाहिजे.
मराठी अस्मिता जागृत करा!
हा फक्त औरंग्याच्या कबरीचा मुद्दा नाही, हा आपला स्वाभिमान, अस्मिता आणि अस्तित्वाचा प्रश्न आहे. जोवर महाराष्ट्रातील मावळे संघटित होत नाहीत, तोपर्यंत बाहेरचे येऊन इथले निर्णय घेत राहतील. आता मराठी माणसाने ठरवायचं – आपण आपल्या भूमीवर स्वाभिमानाने उभे राहणार का, की इतरांनी शिकवण्याची वाट बघणार?
लेखन – रमाकांत बने – ९१७५३७८१९९